लेकरांसाठी बहिणीकडून धान्य आणून दिलं; एसटी कर्मचाऱ्याने जीवन संपवलं

Maharashtra Times 2022-03-28

Views 78

हा सुन्न करणारा आक्रोश एसटी कर्मचाऱ्याच्या घरातला आहे. आर्थिक तणाव आणि कर्जबाजारीपणा यामुळे पत्नी आणि दोन लेकरांना पोरकं करुन जळगाव जिल्ह्यातील शिवाजी पाटील यांनी रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केलीय. शिवाजी पाटील हे यावल येथे पत्नी आणि दोन मुलांसोबत वास्तव्याला होते. गेल्या आठ वर्षांपासून ते यावल आगारात चालक म्हणून नोकरीला होते. पाच माहिन्यांपासून विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय. या संपात शिवाजी पाटील हे देखील सहभागी होते. आज या संपाला साडेपाच महिने झाले, पण कोणत्याही मागण्या मान्य झाल्या नसल्याने संप सुरूच आहे. परिणामी पगार देखील बंद आहे. उत्पन्नाचं कोणतंही साधन किंवा दुसरा जोडधंदा नसल्याने अक्षरशः उपासमारीची वेळ आली आणि शिवाजी पाटील यांनी परिस्थितीसमोर गुडघे टेकले. शिवाजी पाटील हे गुरूवारी शहरातील जुने जळगावातील बहिण लता आणि मेहुणे देवराम पितांबर बारी यांच्याकडे आले होते. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचं त्यांनी बहिणीला बोलून दाखवलं. त्यामुळे बहिणीने परिस्थिती लक्षात घेऊन भावाला तांदूळ, मुलांसाठी कपडे आणि काही सोबत पैसे दिले. हे सामान घेऊन ते रविवारी यावल येथे घरी गेले. पण ही परिस्थिती शिवाजी पाटील यांना असह्य झाली होती. खिशात सुसाईट नोट लिहून ठेवत शिवाजी नगर स्मशानभूमीजवळ रेल्वेरूळावर धावत्‍या रेल्वेखाली त्यांनी आत्महत्या केली. परिस्थिती खराब असल्याने जीवन संपवतोय असं म्हणत शिवाजी पाटील यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी हिरकणीबाई , मुलगा हेमंत आणि मुलगी उत्तेषा, आई, भाऊ असा परिवार आहे. सरकारसाठी ही आणखी एक आत्महत्या असली तरी पाटील कुटुंबासाठी हा प्रचंड मोठा आघात आहे. रडताना सुन्न झालेल्या त्यांच्या पत्नी हिरकणीबाई यांनाही रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली एवढा मोठा हा मानसिक धक्का त्यांना बसलाय. संप सुरू असल्याने एसटी कर्मचाऱ्यांना पगार नाही. त्यामुळे परिस्थिती एवढी बेताची बनलीय की खायचं काय हा प्रश्नही अनेक कर्मचाऱ्यांसमोर निर्माण झालाय. त्यातच तातडीने कामावर हजर होण्याचं दडपण या कर्मचाऱ्यांना अस्वस्थ करतंय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS