नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळं संपूर्ण महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बुधवारी (28 जानेवारी) सकाळी विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. पुण्यातील बारामती इथं लँडिंग करत असताना विमान अचानक कोसळले. या घटनेमुळं राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय वर्तुळातून तीव्र दुःख व्यक्त केलं जात असून, सर्व स्तरांतून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. दरम्यान, या घटनेचा धक्का माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही बसला आहे. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना अनिल देशमुख यांना अश्रू अनावर झाले. अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीनं अनिल देशमुख यांना गहिवरून आलं. ते काहीवेळ पूर्णपणे निशब्द राहिले. त्यांना खूप काही बोलायचं होतं, मात्र भावना दाटून आल्यानं ते काही बोलू शकले नाहीत. त्यांनी हात जोडून माध्यमांसमोर नम्रपणे प्रतिक्रिया देणं टाळले आणि शांतपणे ते तेथून निघून गेले.