जालना : " 35 वर्षात अनेकवेळा अजितदादांशी संबंध आला. त्यांनी माझ्या मतदार संघातील विकासकामं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला", अशी प्रतिक्रिया भाजपा नेते रावसाहेब दानवेंनी अजित पवारांच्या निधनानंतर दिली. गुरुवारी जालन्यातील राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजपा नेते रावसाहेब दानवे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे, आमदार अर्जुन खोतकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. "राज्यात 2024 च्या सत्ता स्थापनेच्या वेळी अजित पवारांनी मला बोलावून घेतलं होतं. त्यावेळी आम्ही सोबतच होतो. 35 वर्षात मतदार संघातील कामांच्या दृष्टीनं अनेकवेळा त्यांच्याशी भेट झाली. त्यावेळी मी त्यांच्याकडं घेऊन गेलेलो कामं करण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला," अशी भावना राबसाहेब दानवे यांनी व्यक्त केली.