तीन सामन्यांमध्ये फक्त दोनच धावा करणाऱ्या ऋतुराज गायकवाडबद्दल जडेजा म्हणाला

TimesInternet 2022-04-04

Views 4

मराठमोळा ऋतुराज गायकवाड हा तिन्ही सामन्यांमध्ये सपशेल अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले आहे. आतापर्यंतच्या तीन सामन्यांमध्ये ऋतुराजला फक्त दोनच धावा करता आल्या आहेत. पराभवानंतर चेन्नईचा कर्णधार रवींद्र जडेजाने ऋतुराजबद्दल एक मोठं वक्तव्य केलं आहे. ऋतुराजने गेल्यावर्षीच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या आणि ऑरेंज कॅपही त्याने पटकावली होती. पण यावर्षीच्या आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये मात्र ऋतुराज अपयशी ठरल्याचेच पाहायला मिळाले आहे. केकेआरबरोबरच्या पहिल्या सामन्यात ऋतुराजला भोपळाही फोडता आला नव्हता. त्यानंतर लखनौ सुपर जायंट्सबरोबर झालेल्या दुसऱ्या सामन्यात ऋतुराजला फक्त एकच धाव करता आली. रविवारी झालेल्या पंजाब किंग्सबरोबरच्या सामन्यात ऋतुराजला फक्त एकाच धावेवर समाधान मानावे लागले. त्यामुळे तीन सामन्यांत ऋतुराजला फक्त दोनच धावा करता आल्या आहेत. तिन्ही सामन्यांमध्ये सपशेल अपयशी ठरलेल्या ऋतुराजबाबत जडेजा म्हणाला की, " ऋतुराज हा एक चांगला खेळाडू आहे, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मला खात्री आहे की, तो नक्कीच पुन्हा एकदा धावांचे डोंगर उभारेल. माझ्यामते सध्याच्या घडीला त्याच्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. जर ऋतुराजचा आत्मविश्वास दुणावला तर नक्कीच तो मोठ्या खेळी साकारू शकतो आणि संघाला चांगली सुरुवात करून देऊ शकतो." आतापर्यंत ऋतुराजची आयपीएलमध्ये आपण फलंदाजी पाहिली तर त्याला पहिल्या काही सामन्यांमध्ये चांगली धावसंख्या उभारता आलेली नाही, पण एकदा का तो स्थिरस्थावर झाला तर तो धावांचे डोंगर उभारू शकतो, हे आपण पाहिले आहे. त्यामुळे आता ऋतुराजला लय कधी सापडते, हे चेन्नईच्या संघासाठी सर्वात महत्वाचे असेल.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS